Saturday, November 12, 2011

IIPA Prize सर्टिफिकेट चित्र

माझे आजोबा -- चित्र व टंकप्रत व्यासपीठ, नाशिक 2012 दिवाळी अंक

माझे आजोबा
संतुष्ट जगण्या – मरणाचा संदेश देणारे माझे आजोबा (तपासून नीट केलेले समाज मनातील बिंब या ब्लॉगवर आहे.)

व्यासपीठ, नाशिक 2012 दिवाळी अंक

 





माझे बालपणातील पहिले दशक धरणगाव आणि जबलपुरला गेले. ते खाऊन पिऊन सुखी दिवस होते. पण शान -शौकत चैन आदी न परवडणारे होते. आजोबा म्हणजे नाना वृध्दत्वाकडे झुकलेले, सबब स्वत सुरू केलेले लाकूड- वखारीचे दुकान वाटणीत धाकटया भावाला देऊन टाखले होते.माझ्या धाकटया आत्याला घटस्फोट घ्यावा लागला असल्याने ती व तीच्या मुलीची जबाबदारी व काळजी दोन्ही त्यांच्यावर आणि अनुषंगाने आई-दादांवर होती. त्यात दादा पीएडी म्हणजे अति उच्च-शिक्षित असूनही त्यांना साधी शिक्षकाची पर्मनंट नोकरी मिळत नव्हती. धरणगावालाच मोठी शाळा , हायस्कूल इत्यादी असल्याने जवळपासच्या खेड्यांत असलेली चुलत- आते भावंड नानांकडेच रहायला येत. आणि त्यावेळी मेट्ररीक असलेल्या आईने पुढे शिकावे अशी आई- दादा आणि माझी सर्वाचीच इच्छा होती. पण बाहेर गावचे रेग्युलर क़ॉलेज परवडणारे नव्हते. नागपूरच्या एसएनडीटी युनिव्हर्सिटीतून प्रायव्हेट परीक्षा देण्यासाठी सुद्धा आई एक –दोन महिने तिथल्या होस्टेलमधे राहून अभ्यास करावा लागत होता. तेंव्हा मी मोठे पणाने खळखळ न करता नानांजवळ राहत असे.
मग दादांना जबलपुरला कॉलेजात प्राध्यपकाची नोकरी मिळून आम्ही जबलपुरला आलो. तेंव्हा नानांची प्रकृती खालावली होती पण त्या काळी क्षयाला औषध नव्हते. त्यातल्यात्यात आत्याला नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळून तीन वर्षांनंतर का होईना ,पण तीला नोकरी मिळून करियर व अर्थाजनाला सुरवात होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र यासाठी ती तीन वर्षे माझ्या आतेबहिणीची जबाबदारी आईने घेणे भाग होती. त्यामुळे ती पण आमच्याबरोबर जबलपुरला आली.
या सर्वांचा परीणाम असा झाला की मी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करचत नसे असे आई सांगते. याऊलट मी जेंव्हा आयुष्यातील त्या काळाकडे पाहते तेंव्हा मला त्या काळात हव्या त्या सर्व गोष्टी आपणाहून मिळत होत्या आणि हट्ट करावा लागल्याची वेळच आली नाही असे मला वाटते. मला काय हवे असे तर वर्गात पहिला नंबर (निदान वरचा) असावा, वाचायला खुप-खुप गोष्टींची पुस्तक असावीत, खेळताना कुणी मला पुरे म्हणू नये. या तिन्ही मला मिळत होत्या खूप भारी खेळली, ड्रेस, दागदागिने यांची हौस नव्हती. नाना –दादांना कुठलेही व्यसन नव्हते. आई चहा घ्यायची पण मुलांना मात्र चहाची सवय नको असा तिचाही खाक्या होता.
आईला अधून मधून सिनेमा बघायला आवडत असे. धरणगावी असताना तिला पुढे करून माझ्या दोन्ही धाकटया चुलत आत्या आणि चुलत बहिणी नानांकडून सिनेमाला जायची परवानगी मिळवायच्या. त्यांचे गणित कच्चे म्हणुन नाना वैतागत असत आणि आई सिनेमाला गेली म्हणून मला घेऊन गणित शिकवत बसत. त्यामुळे मला स्वतचे खुप कौतुक वाटायचेकी कस गणितामुळे मला अण्य मनोरंजनाची गरज भासली नाही. अगदी आजही मला खात्री वाटते की टीव्हीच्या कित्येक सिरियरल्स पेक्षा टीआरपी देणारी सिरिअल आपण रंजकतेने शिकवलेल्या अभ्यासातून निर्माण करू शकतो. नुसती खात्रीच नाही तर सिरिअल कशी असेल त्यांतल्या अभ्यासात कहानीमें ट्विस्ट कसे असतील , आयुष्याच्या खेळाइतकेच थक्क करू शकणारे गणितांचे खेळ त्यांत कसे टाकायचे इत्यादी विषयी माझे थोडे-थोडे लेखन,विचार आणि प्रयोगही चालु असतात. कधीतरी त्यांच्यावरतीही सविस्तर लिहायचे आहे.
जबलपुरला खेळलेला एक खेळ छान लक्षात राहून त्याचा आनंद इथे नमूद करावासा वाटतो. हा खेळ शिक्षकांनी आंम्हा विद्यार्थ्यासाठी आयोजित केला होता. एका टेबलावर खुप निरनिराळ्या सुमारे पन्नास वस्तु मांडून ठेवत. आंम्हाला डोळे झाकून तिथ पर्यत नेत- दहापर्यत आकडे मोजून तेवढा वेळच त्या वस्तू पाहू दिल्या जात आणि मग दुसरीकडे बसून पुढिल अर्ध्या तासात आम्ही आठवतील तेवढया गोष्टींची यादी लिहून काढायची. यामुळे स्मरणशक्ती वाढवता तसेच फोकस करायला मदत होते. तसेच मला डोंबारी खेळाचे भयंकर आकर्षण होते. मला तसे खेळ शिकता आले नाही म्हणूनआजही वैषम्य वाटते आणि इतके खेळगुण अंगात असणा-या या कलावंतांना भारत सरकारच्या खेळ -नितिमध्ये कोणतीही जागा नसल्याचा रागही येतो.
आपण श्रीमंत नाही याची जागच व्हायला एक प्रसंग घडला. आम्ही जबलपुरला आलेलो होतो. आता आईला सिनेमा बघायला घरच्यांची सोबत नव्हती. पण शेजारच्या मैत्रिणींबरोबर विशेषत बेहेरे काकू आणि कमलापुरे काकू यांच्या बरोबर ती जात असे. असाच एकदा त्यांचा कार्यक्रम ठरला पण नेमके तेव्हाच आमच्या शाळेच्या कुठल्याशा फंक्शनमध्ये स्टेजवरच्या कामांत माझी निवड झाली . त्यासाठी नवा ड्रेस लागणार होता. रात्री सर्व निजानिज झाल्यावर आई-दादांच थोडस बोलण झाल की खर्चाची तोंड मिळवणी कशी करायची आणि मग आईने स्वतचा सिनेमाचा बेत रद्द केला . मला अचानक जाग येऊन मी हे ऐकत होते, पण मी ऐकंल हे त्यांना जाणवू नये म्हणून आईला स्वतच्या छोट्याशा करमणुकिला सुद्धा सोडावं लागल ही बाब मनात घर करून राहीली.
समाधीटपणा देखील मुलांना शाळेच्या वयांतच शिकवला पाहिजे. तो माझ्यात नाही हे ही मला एका प्रसंगानं कळलं. शाळेत पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर विविध विषयांवर बोलण्यासाठी काही मुली-मुलांची निवड झाली होती. मला लोकमान्य टिळक हा विषय होता कारण एक ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी असते. मी पण छानपैकी निबंध पाठ करून ठेवला . कार्यक्रमात पहिल्या दोघांनंतर मला बोलायच होतं. पण इतका ताण आला, की मला एक अक्षर आठवेना. ज्या बाईंना आधी निबंध दाखवून झाला होता त्यांनी एक-दोन मुद्यांची आठवण करून दिली पण माझ्या तोंडून अक्षरही फुटेना. पाच मिनिटे वेळ देऊन शेवटी मला बसायला सांगितले. मला कुणी रागावले नाही उलट अस होत कधीकधी पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर असं मुख्याध्यापक म्हणाले. पण माझ हे स्टेजला पुढेही खूप काळ चालूच राहील.
आमच्या घरात वाचणाची चंगळ होती दादांच्या संस्कृत तत्वज्ञानाच्या डिग्रीमुळे महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं असे ग्रंथ भरलेले होते. व त्यातील सर्व गोष्टी आणि घटना आम्ही वारंवार वाचून काढत असू. मग मी महाभारताल्या भीमाचा खेळ स्वताकडे घेऊन माझ्याकडे किती ताकद आहे ते आजमावत असे. त्यासाठी धाकटया भावाला पाठंगुळीशी घेऊन बहीण आणि आत्याच्या मुलीला दोन उजव्या-डाव्या कडेवर घेऊन भरभर फिरत असे. मात्र धावपळीच्या खेळासाठी जेवढी चपळाई हवी त्यामध्ये मी कमी पडत असे. तिसरीत पहिली आल्याचे बक्षीस म्हणून अरेबियन नाईटस हे पुस्तक मिळाले होते आणि चौथीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावली होती. धाकटया भावंडांचा अभ्यास घेण्याचे कामही मी घेतले.
मी पाचवीत असताना देशांमध्ये मोजमापाची जुनी पद्धत जाऊन नवीन दशमान पद्धत लागू झाली आणि शेरऐवजी किलोगॅ्मतर मैलाऐवजी किलोमिटर हे मोजमाप आले. मात्र त्यातील किलो ह्या शब्दाचा अर्थ कुणीही नेमका समजावून न सांगितल्याने आंम्हा विद्यार्थ्याचा खूप गोंधळ होई. त्यातच पूर्वीचे आणे- पैसे जाऊन त्यांच्या जागी सरळ शंभर पैशांचा एक रुपया असे गणित आले. मग जुन्या पैशाला पैसा आणि नव्या पैशाला खडकू (लहान होता म्हणून) अशी बोली नावे पडली. पाचवीच्या परीक्षेत अमूक आण्याचे किती पैसे अशी गणित येणार होती आणि ते शिकवण्याच्या काळांत माझी शाळा बुडालेली होती. परीक्षेच्या दोन मिनिटे आधी एका मैत्रिणीने फॉर्म्युला सांगितला की दोन आण्यांच्या पुढे जेवढे आणे विचारतील त्यांना सहाने गुणून एक मिळवायचा. हा नियम सरसगट लावल्यामुळे माझी दोन गणित चुकून दोन मार्क बुडाले त्याची रुखरुख मनाला खूप दिवस लागली होती.
अशाप्रकारे माझ्यातील गुण- अगुणांची जाणीव मला होऊ लागली होती. हिंदी भाषेवर प्रभुत्व येऊ लागले होते. त्याचबरोबर घरातील जबाबदारीची जाणीवही होऊ लागली होती.
मग एक दिवस दादांना त्यांच्या शर्मा नामक सहाध्यावयांचे पत्र आले. बिहार सरकारच्या अधिपत्याखालील "मिथिला संस्कृत रिसर्च इन्सिट्यूट दरभंगा" येथे प्रोफेसरांची पदे भरण्यासाठी अर्ज मागावले होते. त्यासाठी अर्ज पाठवायचा सल्ला होता. आधीच आम्ही महाराष्ट्रापासून दूर आलेलो, मग इतक्या लांबच्या गावी नोकरी घ्यावी का? नाना म्हणाले हो, तेंव्हा दादांनी आठवण करून दिली की पीचएडी नंतर दादांना कोलंबिया विद्यापिठाकडून संस्कृतच्या पोस्टवर काम करण्याची ऑफर आली होती. पण एकुलता एक मुला परदेशी गेला की तिकडचाच होऊन राहील म्हणून नानांनी नको म्हटले होते. आणि दादांनीही त्यांच्या शब्दाला मान देऊन ती ऑफर सोडली होती. पण अर्थातच आत्ताच्या ऑफर मध्ये खूप फरक होता. मुळात ही नोकरी देशातच असणार होती. जास्त अर्ज येणार नसल्याने जवळपास पक्की होती. सरकारी नोकरी असल्याने पगार कमी वाटत असला तरी पेंशन मिळणार होते. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन नानांनी त्यांना वरभंग्याला इंटरव्ह्युसाठी जाण्यास सांगितले. एव्हाना तिथे काही दिवस रहावे लागले तर माझ्या आजारपणाची काळजी करू नका, काम पूर्ण करून निकाल ऐकून मगच या असे बजावले.
मला ते वीस- तीस दिवस नीट आठवतात. घरात आम्ही चार मुलं.त्यांत मी मोठी म्हणजे नऊ वर्षांची , आईला चौथ्या बाळासाठी दिवस गेलेले. नानांच आजारपण वाढत चाललेलं. माझी व बहीणीची वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि दादांचा दरभंग्याला मुक्काम किमान पंधरा दिवस तरी असणार होता. मी जवळ जवळ रोजच आई आणि नानांच्या औषधासाठी आमचे फॉमिली डॉक्टर मांडवीकर यांच्याकडे जात असे , ते नानांच्या आजाराला एक लांबड , थोडस गोडसर औषध देत. बहुधा कफाचा त्रास कमी करण्यासाठी असावे. पण एक दिवस ते घरी आले आणि म्हणाले दादांना बोलावून घ्या म्हणाले ,नानांना ते पटले नाही. दरभंग्याचा इंटरव्हुय अजून व्हायचा होता. मग नानांनी त्यांच्या मोठया जावयाला बोलवायचे ठरवले. मला आठवते की एकच दिवशी दोन तारा पाठवल्या होत्या . आतोबांना पाठवलेल्या तारेचा मजकूर होता की नानांची तब्येत चांगली नाही, असाल तसे तातडीने या. आणि दादांना मजकूर होता की नाना ठीक आहेत, निर्धास्तपने इंटरव्हुय देऊन निकाल आल्यावर जॉईन होऊन मगच या. एवढे सगळे निर्णय नाना शांत चित्ताने घेत होते.
आतोबा आले त्यानंतर नानांची तब्येत झपाटयाने घसरली, किंबहूना तसे होणार म्हणूनच त्यांना बोलावले होते. दादांची निवड झाल्याची तार आली , पाठोपाठ त्यांनी नोकरीत आठवडाभर काम करून मगच सुट्टी घ्यावी असा डायरेक्टरांचा सल्ला आहे. शिवाय घर बघावे लागणार आहे. तरी नाना कसे आहेत ते कळवा अशीही तार आली. त्यालाही नानांनी सांगितल्यावर हुकुम मीच तार पाठवली होती की सर्व कामे आटोपून मगच या.
आणि नाना अशी गोष्ट बोलले जिने आजतागायत माझ्या विचारांना खूप भंडावले आहे. त्यांनी आईला सांगितले की लवकरच अमुक दिवशी हनुमान जयंती आहे.- चांगला मुहुर्त आहे, त्या दिवशी मी प्राण सोडीन, मी पण हे ऐकले.मात्र महाभारतातील भीष्म कथा माहीत असल्याने मला या वाक्याचे तेंव्हा खूप आश्चर्य वाटले नाही. कोणालाही इच्छामरण असू शकते. असेच मला वाटले. तो पर्यत मी कोणाचेही मरण पाहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे गांभीर्यही वाटले नाही. त्या दिवशी दादा घरी नसतील, त्यांच्या परत येण्याला अजून काही अवकाश असेल , पण त्यांना डिस्टर्व करू नका, जावयाने मुखाशी देऊन चाललो असे नानांनी बजाऊन सांगितले. पुढे आईला असा सल्ला दिला की , आता तुंम्ही बिहार मध्ये जात आहात तर माझ पहिल श्राद्ध गवा येथे जाऊन करा म्हणजे दरवर्षी तुंम्हाला वर्षश्राद्ध करावं लागणार नाही.
आणि तीन- चार दिवसांनी जेंव्हा हनुमान जयंतीचा दिवस उजाडला तेंव्हा त्यांनी आतोबांकडून छोटीशी अंघोळ घालून घेतली . आईला थोडी खीर करायला सांगितली. नैवैद्य दाखवून खीर खाल्ली. मग मग कॉटवरून खाली येऊन चटई घालून झोपले. एक-दीडच्या सुमारास मुलांना खेळायला बाहेर पाठवं असं आईला सांगितल्यावरून आंम्ही सर्व शेएजारी पोहनकरांकडे गेलो . चारच्या सुमारास आईने बोलावले की, नाना वारले आहेत. दादांना तार करून ये.
हा प्रसंग माझ्या मनावर ठसलेला आहे. हे निव्हळ शांत मरण नव्हतं तर पूर्ण जाणीवेच्या अवस्थेतील मरण होत अस मला वाटत. हे त्यांनी कस साधल याच आश्चर्य अजून जात नाही. उलट माझी प्रबळ इच्छा आहे की माझं मरण देखील असच असावं. पूर्ण जाणीव ठेऊन –रागद्वेष मनात न राहता- समाधानाने –आणि माझं मी ठरवून. पण हे कसं साध्य करतात.
असो. तार मिळल्यावर मिळेल ती पहिली गाडी पकडून जबलपुरला येण्यासही दादांना चार दिवस लागले. तोपर्यंत नानांचे विधी थांबवले नव्हते.त्यांची सुचनाच तशी होती. शेवटचे दर्शन न झाल्याने दादांना खूप हळहळ वाटलीच. आधी त्यांनी यासाठी आईला जबाबदार मानलं. पण आमचे घर मालक डॉ. वाजपेयी, आतोबा आणि डॉ. मांडवीकरांनी त्यांची समजूत काढली.
या प्रसंगानंतर काही दिवसांतच आम्ही दरभंगा येथे दाखल झालो. यथावकाश सर्वजण गयेला जाऊन नानांच श्राद्ध केलं . नानांचं पर्व आयुष्यातून संपल. धाकटया भावंडांना त्यांचा सहवास फारसा लाभला नव्हता. मला मात्र त्यांनी गणित या विषयीकडे एक दार्शनिक दृष्टीने पहायला शिकवल. त्यातला आनंद मला समजला आणि आयुष्यभर पुरतोय हे मोठ संचितच मला वारसाहक्काने मिळालं. मरणाच्या बाबतीतही तस मिळाल पाहिजे ही माझी आंतरिक ओढ कायम राहील.  
-----------------------------------------------------------------------------------------------------